• Home
  • संपादकीय
  • Gallery
  • Contact
Warnecha Wagh
एक परिपूर्ण निर्भीड वृत्तपत्र
1000874865
राष्ट्रीय

देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय – मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

by संपादक सप्टेंबर 3, 2024
written by संपादक

श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा, वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन

         वारणानगर (वारणेचा वाघ वृत्तसेवा) देशाच्या आर्थिक विकासात खाजगी उद्योग आणि व्यापार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याचप्रमाणे देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय असल्याचे प्रतिपादन मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. वारणानगर येथे आयोजित श्री वारणा महिला सहकारी उद्योग समुह सुवर्ण सोहळा आणि वारणा विद्यापीठ उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, वारणा बँकेचे चेअरमन निपुन कोरे, सावित्री महिला सहकारी संस्थेच्या चेअरमन शुभलक्ष्मी कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

             यावेळी दारिद्र्य निर्मूलन, अन्न सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यामध्ये सहकार संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, काळानुरूप सहकार संस्थांनीही स्वत: ला बदलण्याची गरज असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्थापनाला व्यावसायिक बनवले पाहिजे. वारणा समुहाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात संबोधित करताना त्यांनी आनंद होत असल्याचे सांगून वारणा उद्योगाच्या सर्वांगीण विकासात योगदान दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे कौतुक केले. सहकारी संस्थांमध्ये त्यांच्या सभासदांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. कोणतीही सहकारी संस्था कुणाच्या वैयक्तिक स्वार्थाचे आणि फायद्याचे साधन बनू नये, अन्यथा सहकाराचा उद्देशच नष्ट होईल, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. सहकारात खरे सहकार्य हवे, व्यक्तीहित नको असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

 

          देशात साडेआठ लाखांहून अधिक सहकारी संस्था कार्यरत आहेत. परंतु अनेक सहकारी संस्था भांडवल, संसाधनांचा अभाव, व्यवस्थापन अशा समस्यांना सामोरे जात आहेत. तरुणांना सहकारात सहभागी करून प्रशासन आणि व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यास तरुण त्या संस्थांना नवसंजीवनी देऊ शकतात. सहकारी संस्थांनीही सेंद्रिय शेती, साठवण क्षमता निर्माण करुन, इको-टुरिझम यांसारख्या नवीन क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सहकारामुळे देशात येत्या काळात अजून समृद्धी येईल. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी 2021 मध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही सहकार क्षेत्राच्या सुव्यवस्थित आणि सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सहकार धोरण आणण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्राथमिक ते उच्चस्तरीय सहकारी संस्थांपर्यंत अनेक प्रयत्न केले जात आहेत. सहकारी संस्थांना विविध योजनांतर्गत आर्थिक, तांत्रिक व प्रशिक्षण संबंधित सहाय्य दिले जात आहे. सर्व संस्थांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले.

राष्ट्रपतींनी केले उपस्थितांना आवाहन

•शिक्षणाचे महत्त्व समजून घ्या आणि तुमच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. चांगले आणि नैतिक शिक्षण जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल. 

•नवीन तंत्रज्ञान शिकण्यात आणि स्वीकारण्यात पुढे रहा. हे तुमचे जीवन केवळ सोयीस्कर बनवणार नाही तर तुम्हाला त्याच्या गैरवापराबद्दल जागरूक करतील.

•आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण संरक्षणाला महत्त्वाचे स्थान द्या कारण पृथ्वी माता आणि तिची मुले वाचवण्यासाठी तुमचे छोटे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील.

•तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांना शक्य तितकी मदत करा आणि त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करा.

•देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी नेहमी तयार राहा. आमचे वैयक्तिक आणि सामूहिक प्रयत्न भारताला जागतिक स्तरावर उच्च स्थान मिळवून देतील.

स्व .तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

          विकासामध्ये जो पर्यंत महिलांची भागीदारी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला विकास करता येणार नाही.  सहकारातून क्रांती घडू शकते. याचे खरं मॉडेल वारणानगरमध्ये येवून लोकांनी पहावं म्हणूनच येथील झालेल्या कामाबद्दल सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांना पद्म पुरस्कार मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, वारणा समुहामध्ये साखर कारखाना, दूग्ध उत्पादन, शिक्षण मंडळ, वीज निर्माण संस्था, सहकारी बँक, महिलांची बँक, शेती प्रशिक्षण संस्था, सहकारी बँक, महिलांची पतसंस्था, व्यायाम मंडळ, भगिनी मंडळ, सहकारी ग्राहक चळवळ, महिला औद्योगिक सहकार चळवळ, वारणा बाजार इ. विविध क्षेत्रामध्ये झालेली क्रांती थक्क करणारी आहे. 3 हजार कोटींच्या घरात उलाढाल आज वारणा समुहात होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. विकसित भारत होण्यासाठी महिला जोपर्यंत अर्थव्यवस्थेचा  केंद्रबिंदू होणार नाहीत तो पर्यंत विकसित भारत देशाचंही स्वप्न पूर्ण करता येणार नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन पाठिंबा देत असून लखपती योजना, लेक लाडकी योजना, माझी लाडकी बहीण योजना, मोफत शिक्षण, मोफत एसटी प्रवास या योजनेतून त्या अधिक सक्षम होत आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. 

       वारणा समुहाचे प्रमुख तथा आमदार डॉ.विनय कोरे यांनी प्रास्ताविक करताना भारताचे राष्ट्रपती सार्वजनिक कार्यक्रमात पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यात आल्याने त्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाचे वारणा विद्यापीठास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल आभार मानले. त्यांनी प्रास्ताविकामध्ये वारणा समुहाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. वारणा समूहातील कार्यरत महिलांनी राष्ट्रपतींना शिवराज्याभिषेक तेलचित्र भेट म्हणून दिले. तर सावित्री महिला सहकारी संस्थेच्या संचालिका शुभलक्ष्मी कोरे यांनी राष्ट्रपती महोदयांचे कोल्हापुरी अलंकार व साडी देवून स्वागत केले. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

सप्टेंबर 3, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000873839
राष्ट्रीय

मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

by संपादक सप्टेंबर 2, 2024
written by संपादक

         कोल्हापूर (वारणेचा वाघ वृत्तसेवा ) भारताच्या मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पुरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. 

 

         यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी आदी उपस्थित होते.

         सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले. 

         श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात प्रथमच भारताच्या राष्ट्रपती यांनी श्री अंबाबाई मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतल्याची माहिती सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

 

सप्टेंबर 2, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000873352
राष्ट्रीय

मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

by संपादक सप्टेंबर 2, 2024
written by संपादक

        कोल्हापूर (वारणेचा वाघ वृत्तसेवा ): मा.राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू यांचे मा. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कोल्हापूर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

 

 

          यावेळी केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार विनय कोरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरचे ब्रिगेडीअर ए. एस. वाळींबे, सीआयडी विभागाचे एडीजी प्रशांत बुरडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनीही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.                   

सप्टेंबर 2, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000862073
कोल्हापूर

गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील

by संपादक ऑगस्ट 31, 2024
written by संपादक

            कोडोली (प्रतिनिधी) गोकुळ दूध संघाने नुकत्याच जाहीर केलेल्या सायलेस बॅग व विमा योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून गोकुळ दूध संघाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उत्पादकांनी लाभ घेऊन आपला व आपल्या परिवाराचा आर्थिक विकास करून घ्यावा असे आवाहन गोकुळ संचालक अमरसिंह पाटील यांनी केले.

           कोडोली येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्था ,यशवंतराव चव्हाण दूध संस्था व हनुमान दूध संस्था या तीन संस्थांची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.  यशवंतराव चव्हाण पतसंस्था व हनुमान दूध संस्थेचे अहवाल वाचन सचिव धर्मेंद्र शेळके यांनी केले तर यशवंतराव दूध संस्थेचे अहवाल वाचन महेश मतसागर यांनी केले.

            अमरसिंह पाटील म्हणाले तीनही संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी पारदर्शक व काटकसरीचा कारभार करून संस्थेची प्रगती केली आहे. हे त्यांचे कार्य कौतुकास्पद असून पतसंस्था येत्या आर्थिक वर्षात परिपूर्ण नफ्यात येईल यानंतर सभासदांना लाभांश देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी म्हैस दूध उत्पादकांना एक रुपये तर गाई दुधासाठी साठ पैसे फरक बिल देण्याचे जाहीर केले.

           यावेळी हनुमान दूध संस्थेचे सभासद छाया भानुसे, सर्जेराव मोरे, मंदा लोंढे, अशोक पाटील, सुजाता शेळके, माणिक पाटील तसेच यशवंतराव चव्हाण दूध संस्थेचे सभासद विक्रम गोसावी, संतोष मगदूम, संदीप मतसागर, नंदा पवार, दिलीप पाटील, महेश मतसागर या दूध उत्पादकांनी संस्थेस जास्तीत जास्त दूध पुरवठा केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

            याप्रसंगी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन आप्पासाहेब मतसागर, व्हा. चेअरमन गणपती शेडगे ,हनुमान दूध संस्थेचे अध्यक्ष बळवंत राबाडे ,उपाध्यक्ष माणिक पाटील, यशवंतराव चव्हाण दूध संस्थेचे अध्यक्ष शंकर मगदूम, उपाध्यक्ष संपत पाटील, कोडोली ग्रामपंचायतचे उपसरपंच माधव पाटील, पन्हाळा अर्बनचे चेअरमन प्रवीण पाटील,कोडोली हौसिंगचे चेअरमन मानसिंग पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे संचालक, सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश शेडगे यांनी केले तर आभार संजय मतसागर यांनी मानले.

ऑगस्ट 31, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000859106
कोल्हापूर

कोडोली नगरभूमापन कार्यालयात तातडीने अधिकारी नेमणूक करावी

by संपादक ऑगस्ट 30, 2024
written by संपादक

राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे तहसीलदारांना निवेदन 

             कोडोली (प्रतिनिधी) येथील नगरभूमापन कार्यालयात परीक्षक भूमापन अधिकारी यांची तातडीने नेमणूक करून नागरिकांची होणारी गैरसोयी दूर करावी अशा मागणीचे निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अदीक जाधव यांनी दिले.

            गेले कित्येक महिन्यापासून कोडोली भूमापन कार्यालयात कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने नागरिकांना त्यांच्या कामासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. याबरोबरच तलाठी कार्यालयातील मंडल अधिकारी व तलाठी यांची बदली झाल्याने गेले तीन ते चार महिने या कार्यालयाचे कामकाज ठप्प आहे. तरी या दोन्ही कार्यालयात तातडीने अधिकार्‍यांची नेमणूक करून  नागरिकांची गैरसोय टाळावी असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी पन्हाळा- शाहूवाडी विधानसभा अध्यक्ष संदीप जाधव समीर शेख, युवराज गोसावी, ओंकार माने, रोशन काळे, निलेश महापुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ऑगस्ट 30, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000858453
कोल्हापूर

मिस मेरी गोथे दुर्कस महिला मंडळाचा 31 ऑगस्टला शताब्दी महोत्सव

by संपादक ऑगस्ट 30, 2024
written by संपादक

           कोडोली (प्रतिनिधी) येथील मिस मेरी गोथे दुर्कस महिला मंडळाचा शतक महोत्सवी समारंभ ३१ ऑगस्ट रोजी कोडोली चर्चेच्या खुल्या पटांगणावर होणार आहे. यावेळी स्मरणिका प्रकाशन, महिला मेळावा, विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार असे कार्यक्रम होणार असल्याची माहिती अध्यक्षा सुनंदा चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

         शंभर वर्षांपूर्वी परदेशातून मिशनरी म्हणून कोडोली येथे आलेल्या मिस मेरी गोथे यांनी 30-35 महिलांना एकत्र करून महिला मंडळाची स्थापन केली. या महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शोषित, पीडित ,दलित तसेच निराधार महिलांना आधार देण्याचे काम केले. याबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांचे ११ जानेवारी १९३० रोजी निधन झाले. त्यांचे स्मरण व महिला मंडळांचा शतक महोत्सव निमित्त गेले वर्षभर भजन स्पर्धा, समूह गायन, प्रश्नमंजुषा, निबंध, परिसंवाद, खेळ, रांगोळ्या अशा विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. अशी माहिती सुनंदा चोपडे यांनी यावेळी दिली.

         या शताब्दी महोत्सवास कोडोली परिसरातील महिला मान्यवरासह सांगली, कोल्हापूर ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, बेळगाव इत्यादी जिल्ह्यातून महिला प्रतिनिधी, त्या त्या मंडळांचे पदाधिकारी ,धर्मगुरू, केसीसी शाळांचे मुख्याध्यापक, केसीसी कार्यकारणी, यु.सी.एन.आय. कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख संदेशकार म्हणून वर्षा कनेर यांची उपस्थिती लाभणार आहे. पत्रकार परिषदेस महिला मंडळाच्या सेक्रेटरी सुमन आढाव ,खजिनदार एस्तेर समुद्रे, कार्यकारी अध्यक्षा सुरेखा गायकवाड यांच्यासह महिला पदाधिकारी, चर्च सेक्रेटरी डी. के. चोपडे, खजिनदार डॅनियल गायकवाड,  एस. आर. रणभिसे आदी उपस्थित होते

ऑगस्ट 30, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000796878
कोल्हापूर

जिल्हा पातळीवर उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘रत्ना उद्योग’ चा शासनाकडून सन्मान

by संपादक ऑगस्ट 24, 2024
written by संपादक

            कोडोली (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या वतीने जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिरोली एम.आय.डी.सी. येथील रत्ना उद्योग या कंपनीस प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सौ.राजश्री पाटील ,मनोहर पाटील, सचिन पाटील, नितीन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

             महाराष्ट्र शासन उद्योग संचालनालय ,मुंबई यांच्या वतीने प्रत्येक वर्षी जिल्हा पातळीवर जिल्हा उद्योग केंद्र मार्फत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या यशस्वी लघु उद्योजकांना पुरस्कार प्रदान केला जातो.सन २०२२-२३  मध्ये रत्ना उद्योग समूहाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल या उद्योग समूहास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

          सौ.राजश्री पाटील आणि मनोहर पाटील यांनी २००४ मध्ये रत्ना उद्योग ची स्थापना केली. गेल्या वीस वर्षात कंपनीचे संचालक सचिन पाटील आणि नितीन पाटील यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील अभ्यास करून कंपनीत तयार होणारे ४५% उत्पादन निर्यात करण्यावर भर दिला. याची दखल घेऊन वरील पुरस्कार देण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.

ऑगस्ट 24, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
WhatsApp Image 2024-08-21 at 9.39.52 AM
कोल्हापूर

प्रस्तावित वारणा विद्यापीठाच्या माहिती संसाधन केंद्र, संचालक पदी डॉ. शशीकुमार तोटद

by संपादक ऑगस्ट 24, 2024
written by संपादक

                          कोडोली (प्रतिनिधी)श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र शासनाच्या समूह विद्यापीठ संकल्पनेच्या अंतर्गत होऊ घातलेल्या वारणा स्टेट पब्लिक विद्यापीठाच्या माहिती संसाधन केंद्र, संचालक पदी आणि  तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मधील कम्प्युटर सायन्स आणि इंजीनियरिंग विभागात प्रोफेसर म्हणून डॉ. शशीकुमार तोटद यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. 

                        डॉ.शशीकुमार तोटद शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेचा ३२ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे.  त्यांनी जीएमआर,राजम, आंध्र प्रदेश, के. एल. ई. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी हुबळी यासारख्या नामांकित संस्थेमध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागात  प्रोफेसर आणि विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे शंभरहून अधिक शोधनिबंध वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहेत. डॉ. तोटद यांची आत्तापर्यंत तीन पेटंट भारत सरकारने प्रकाशित केले आहेत. 

                      त्यांच्या निवडीबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयर कोरे यांनी अभिनंदन केले. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, डीन डॉ. एस. एम. पिसे, प्रभारी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, यांच्यासह वारणा विद्यापीठाचे  संचालक ,सर्व विभागप्रमुख  व पदाधिकारी उपस्थित होते.

ऑगस्ट 24, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000794438
कोल्हापूर

शेतमजूर ते कोडोलीचे प्रसिद्ध कर सल्लागार- शामराव हुजरे- लोखंडे

by संपादक ऑगस्ट 17, 2024
written by संपादक

        कोडोली येथील गणपती गल्लीत तीन खोल्यांचे  घर, खापऱ्यांनी शेकारलेले छप्पर, या इवल्याशा घरात आई-वडील, चार भाऊ, बहीण, भावजयी, पुतणे असे सोळा माणसांचे कुटुंब. स्वमालकीची शेतीवाडी नाही. अशी कौटुंबिक परिस्थिती असणाऱ्या ध्येयवेढ्या तरुणांने शेतमजुरी व छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत अत्यंत कठीण परिस्थितीत एम. कॉम. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून 1991 सली कोडोलीत भाड्याच्या खोलीत कर सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू केला. त्यांची कामावरील निष्ठा व लोकांचा विश्वास यामुळे कोडोली परिसरात ज्यांची प्रसिद्ध कर सल्लागार अशी ओळख निर्माण झाली ते म्हणजे शामराव रामचंद्र हुजरे- लोखंडे. त्यांच्या अध्यायावत व प्रशस्त ऑफिसची स्वप्नपूर्ती आज रविवार दि. १८/ ८/ २४ रोजी पूर्ण होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध घटना विषयी घेतलेला थोडक्यात आढावा…..

👉 तुमचे बालपण व कुमारावस्थेचा काळ याविषयी काय सांगाल?

    – बालपण व कुमारावस्थेचा काळ अत्यंत गरिबीत व्यतीत झाला. घरात वडील, आई आकुबाई, चार भावात मी धाकटा, जन्माने दुसऱ्या क्रमांकावर असलेली एक बहीण असा आमचा कुटुंबकबीला होता. आमच्या मालकीचे फक्त तीन खोल्यांचे साधे घर होते.  गावात स्वतःच्या मालकीची वितभर देखील जमीन नाही. त्यामुळे घरचे रहाटगाडगे ओढण्यासाठी आई-वडील व भावंडे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायचो. 

👉गरीबीतून शाळा कशी शिकलात?

     – जसं मला कळायला लागले तेव्हापासून दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करू लागलो. शाळा शिकण्यासाठी आमची परिस्थिती नव्हती तरीही वडिलांनी कोडोलीच्या पूर्वाश्रमीच्या जीवन शिक्षण विद्यामंदिर (आत्ताचे एक कुमार विद्यामंदिर) शाळेत नाव दाखल केले होते.  मोलमजुरी करत या शाळेतून कोडोली हायस्कूल मध्ये दाखल झालो. दहावीपर्यंत दुसऱ्याच्या शेतात भांगलन, कोळपण, पेरणी, काढणी वगैरे कामे करत शिक्षण घेतले. त्यावेळी लहानग्यांना दिवसाला चार रुपये तर मोठ्यांना सहा रुपये पगार मिळायचा आलेल्या पगार आई-वडिलांच्या हातात द्यायचो.

👉शालेय जीवनात मौजमजा करत होतात काय? 

    – कसली मजा करताय? अंगात सणासुदीला ड्रेस मिळायचा. त्या काळात अंगात सुंदर कपडे पण घालायला मिळत नसत. मांजरपाट कापडाची पांढरी विजार त्याच कापडाचा सदरा, कधी गुडघ्यापर्यंत ढगळी अर्धी चड्डी असा पेरावा असायचा. पायात चप्पल नसायचे असल्या अवतारात कशाची मजा आलीय!

👉दहावी नंतर पुढे काय? 

     – दहावी नंतर पुढे तीन वर्षे शिक्षणास बंद पडले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या मलेरिया विभागात नोकरी पत्करली.  वारणा साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजुरांचा मलेरिया सर्वे करून त्यांना औषधोपचार करण्याचे काम केले. गळीत हंगामात सहा महिने हे काम करायचे व नंतरच्या सहा महिन्यात डीडीटी पावडर फवारण्यासाठी संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात फिरत असत असे. त्यावेळी दरमहा ४५० रुपये पगार मिळत असे. १९७५ ते १९८५ पर्यंत हे काम केले

👉महाविद्यालयीन शिक्षणाकडे कसे वळलात? 

    – सन १९८० ला वाणानगरमधील वारणा महाविद्यालयातील वाणिज्य विद्या शाखेत अकरावी वर्गात प्रवेश घेतला. सकाळी कॉलेज करायचे व दिवसभर मलेरिया विभागात काम करायचे. सन १९८५ ला बी. कॉम. होईपर्यंत मलेरिया विभागात काम केले.

👉नोकरी व अभ्यास हे वेळापत्रक कसे काय साधले? 

     – सकाळी कॉलेज, दिवसभर नोकरी, रात्री दहा ते पहाटे चार पर्यंत अभ्यास अशा प्रकारे वेळेचे नियोजन केले होते. शरीर व मनाला विश्रांती मुळी नव्हतीच!

👉पदवीधर झाल्यावर पुढे काय केले? 

     – सन १९८५ ला बी. कॉम. झाल्यावर कोरे कुटुंबियांच्या वारणा  इलेक्ट्रॉनिक्स येथे अकौंटंट पदावर नोकरीस लागलो. नोकरी करत एम. कॉम. हे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

👉 पदव्युत्तर शिक्षण कोठे घेतले? 

     – कोल्हापूरच्या रत्नाप्पा कुंभार नाईट कॉलेजमध्ये मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन १९८८ चा हा काळ रात्री कॉलेज करून रात्रीचे साडेआठ वाजता कोडोलीला  मिळेल त्या वाहनाने घरी येत असे. दिवसभर वारणा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरी करायचो. त्या काळात मला महिन्याला पाचशे रुपये पगार मिळायचा. सन १९९१ पर्यंत मी ही नोकरी केली.

👉लग्न केव्हा केले? 

     – सन १९८९ साली कोतोली (माळवाडी) ता. पन्हाळा येथील सुनंदा या बारावीच्या कला वर्गात शिकणाऱ्या मुलीशी माझे लग्न झाले. दुर्दैवाने माझ्या वडिलांना माझे लग्न पाहता आले नाही. माझ्या लग्नाच्या आधी १९८८ साली त्यांचे निधन झाले होते.

👉 कर सल्लागार म्हणून स्वतंत्र व्यवसाय केव्हा सुरू केला? 

    – २६ जानेवारी १९९१ ला कोडोलीत भाड्याच्या जागेत कर सल्लागार व्यवसाय सुरू केला. त्यावेळी आम्ही भावंडे विभक्त झालो होतो. कार्यालयाच्या गळ्यासाठी डिपॉझिट द्यायला पैसे नव्हते म्हणून पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाण ठेवून कर्ज काढले व डिपॉझिट दिले.

👉संकटाच्या काळात ओळखीची माणसे पाठ फिरवतात याबद्दल तुमचा अनुभव काय? 

     – तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु जगात सर्वाच माणसे वाईट नसतात. त्या काळात श्री अनंत विरुपक्ष उबारे, कै. अण्णा चरणकर, प्रविण पाटील, नामदेव पाटील- त्रिपणे, इत्यादी व्यापाऱ्यांनी मला खूप मोठे सहकार्य केले. त्यांचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही.

👉 स्वमालकीच्या कार्यालयात आल्यानंतर तुमच्या समस्या दूर झाल्यात का? 

 

 

     – 1995 ला मी स्वतःच्या घरात माझे ऑफिस सुरू केले. त्यामुळे अनेक समस्या सुटल्या. तसेच भाडे वाचले यामुळे उत्पन्न वाढायला लागले. त्यावेळी दरमहा पंधरा हजार रुपये नफा मिळायला लागला. सन 2000 मध्ये कोडोलीच्या पोखले फाट्यावर शामूनानानगर येथे प्लॉट घेऊन सन 2003 साली तिथे बंगला बांधला व या बंगल्यातच ऑफिस सुरू केले.

👉आजची परिस्थिती व कुटुंबाविषयी काय सांगाल?

– अनेक संकटाशी तोंड देऊन कष्टाने व प्रामाणिकपणे हा व्यवसाय केल्याने आज माझा व माझ्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला असून कौटुंबिक जीवनही अतिशय व्यवस्थित सुरू आहे. त्याचबरोबर मी पाहिलेली दोन्ही स्वप्ने पूर्ण होत आहेत याचा मला खूप आनंद वाटत आहे. यातील पहिले स्वप्न म्हणजे माझ्या व्यवसायाकरिता प्रशस्त असे ऑफिस असावे हे होते. ते रविवार दि.१८/८/२४ रोजी पूर्णत्वास जात असून हुजरे कॉम्प्लेक्स, शामुनानानगर, पोखले रोड, कोडोली या ठिकाणी तीन मजली इमारतीत माझे प्रशस्त असे ऑफिस सुरू होत आहे . माझे दुसरे स्वप्न होते की माझ्या दोन मुलांपैकी एकाने चार्टड अकौंटंट( CA) व्हावे हे स्वप्नही माझा दोन नंबरचा चिरंजीव धीरज याने पूर्ण केले असून त्याने 10 जानेवारी 2023 रोजी चार्टड अकौंटंटचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. माझा मोठा मुलगा सुशांत एम. कॉम. असून तो व धीरज हे दोघेही मला आता व्यवसायात मदत करत आहेत. सुशांत याचे २०/०१/२० साली लग्न झाले असून त्याची पत्नी  सौ. प्राजक्ता ही सुद्धा एम. कॉम. आहे व ती सुद्धा मला व्यवसाय हातभार लावत आहे. ०६ जानेवारी 2023 मध्ये तनुष या नातवाचे आगमन (जन्म) झाले व १० जानेवारीला चिरंजीव धीरज चार्टड  अकौंटंट झाला हे दोन्ही दिवस माझ्या आयुष्यातील आनंदाचे दिवस आहेत. दरम्यान माझे दुसरे चिरंजीव चार्टड  अकौंटंट धीरज यांचा विवाह ठरला असून त्याची नववधू चि. सौ. का. सायली डॉक्टर आहे. तिच्यासाठी माझ्या नवीन इमारतीमध्ये दवाखाना सुरू करण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली आहे. लवकरच तिच्या दवाखान्याची आम्ही सुरुवात करणार आहोत .या सर्व यशात मला माझी पत्नी सौ. सुनंदा हिची मोलाची साथ मिळाली. एकंदरीतच आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी हा टप्पा गाठल्याचा मला मनस्वी आनंद होत आहे.

👉व्यवसाय व्यतिरिक्त आपणास कोणता छंद आहे ?

– लहानपणापासूनच मला सामाजिक कार्याची आवड आहे. कोडोलीतील गणेश तरुण मंडळांचा मी सक्रिय कार्यकर्ता होतो. सहकाऱ्यांच्या योगदानातून कोडोलीत आम्ही गणेश मंदिर उभारले आहे. याबरोबरच जेष्ठ नागरिकांना मी मोफत कर सल्ला देतो. कर व गुंतवणूक  विषयी मोफत व्याख्याने देतो. आमच्या कॉलनीतील आर्थिक व इतर व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी नागरिकांनी विश्वासाने माझ्यावर सोपवली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडतो आहे.

ऑगस्ट 17, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000791347
कोल्हापूर

छत्रपती शाहू संस्थेच्या माध्यमातून तरुणांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली- डॉ. अशोकराव माने

by संपादक ऑगस्ट 16, 2024
written by संपादक

              जयसिंगपूर (प्रतिनिधी) छत्रपती शाहू को- ऑपरेटिव्ह इंडस्ट्रिअल इस्टेट या संस्थेच्या माध्यमातून वाटचाल करीत असताना ग्रामीण भागातील तरुणांना उद्योग उभा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे हजारो बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. असे सांगून येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून उद्योजकांच्या प्रगतीसाठी नाविन्यपूर्ण प्रकल्प हाती घेऊन संस्थेचा विकास केला जाईल असे आश्वासनसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी दिले.

            मौजे आगर येथे छत्रपती शाहू को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीअल इस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली यावेळी ते बोलत होते. व्यवस्थापक सुरेंद्र तिवडे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. स्वागत प्रस्ताविक उपाध्यक्ष संजय पाटील- चिपरीकर यांनी केले. ते म्हणाले डॉ.अशोकराव माने यांनी या संस्थेच्या प्रगतीसाठी मोठे परिश्रम घेतले आहेत. त्यांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याची चांगली संधी आहे .त्याकरिता आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

             जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाषसिंग रजपूत यांनीही डॉ. अशोकराव माने यांच्या कार्याचा आढावा विशद केला. यावेळी सुरेश रेडेकर, भारत माणगाव, निलेश शिंदे, डॉ. अरविंद माने, दयानंद जाधव, पंकज दौंडे, बबन बने, रेखा कांबळे, अश्विनी गायकवाड, सुधा वायचळ, सागर कोळी, सुहास राजमाने, अतुल साखरपे, राम बोडगे, चंद्रकांत टारे, चंद्रशेखर मुंडे, सागर चावरे, विलास बिंदगे, दीपक बुबणे, संतोष माने यांच्यासह सभासद उपस्थित होते.

ऑगस्ट 16, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
Newer Posts
Older Posts

संपादक

संपादक

प्रवीण पाटील, संपादक, वारणेचा वाघ.

वारणेचा वाघ वाचकांनो, २३ वर्षांचा प्रेरणादायक प्रवास तुमच्या सोबतीमुळेच शक्य झाला. वाचन हा ज्ञानाचा खरा खजाना आहे, वाचन सुरू ठेवा आणि मनाच्या आकांक्षांना पंख लावून द्या!

Recent Posts

  • देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय – मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
  • मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
  • गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील
  • कोडोली नगरभूमापन कार्यालयात तातडीने अधिकारी नेमणूक करावी

Recent Comments

  1. Sushant subhash chavan च्यावर कोडोलीतील कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक – प्रशासनास उशिरा सुचलेले शहाणपण.
  2. Dr. Sanjay Sagaru Sapkal च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  3. ANIL PATIL च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  4. ANIL PATIL च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  5. Dipak chavan च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Bloglovin

Recent Posts

  • देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय – मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    सप्टेंबर 3, 2024
  • मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

    सप्टेंबर 2, 2024
  • मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

    सप्टेंबर 2, 2024
  • गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील

    ऑगस्ट 31, 2024
  • कोडोली नगरभूमापन कार्यालयात तातडीने अधिकारी नेमणूक करावी

    ऑगस्ट 30, 2024

कॅटेगरीज

  • Uncategorized (3)
  • कोल्हापूर (257)
  • जागतिक (1)
  • महाराष्ट्र (112)
  • राष्ट्रीय (46)
  • वारणेचा वाघ फौंडेशन (6)
  • साप्ताहिक (8)
  • Facebook
  • Twitter

@2021 - All Right Reserved. Designed and Developed by PenciDesign


Back To Top
Warnecha Wagh
  • Home
  • संपादकीय
  • Gallery
  • Contact