लॉकडाऊनमध्ये खत पुरवठा नियोजन सुरळीत – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे दि.२० एप्रिल २०२० कोल्हापूर(प्रतिनिधी) लॉकडाऊन कालावधीमध्ये रासायनिक खतांची उपलब्धता रहावी याकरिता खत पुरवठा नियोजन सुरळीत करण्यात आलेले आहे. त्याचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घेवून शेती व शेतीपूरक कामे वेळच्या-वेळी करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी आज केले. शेती व शेतीपुरक कामे- शेतीची मशागत करणे, लागवड करणे, पिकांच्या/ फळझाडांच्या आंतरमशागतीची कामे करणे. तसेच फळझाडे व इतर पिकांची काढणी व विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. तसेच शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, किटकनाशके उपलब्धतेसाठी जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्रे सुरू ठेवण्यात येत आहेत. शेतीसाठीची औजारे, मशिनरीची दुकाने चालू ठेवणे, त्यांचे स्पेअरपार्टस् तसेच विक्रीपश्चात सेवा याकरिता सर्व संबंधितांना सूचना दण्यात आल्या आहेत. मनरेगा अंतर्गत ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी कामे हाती घेण्याबाबत- ग्रामीण भागात गरजवंतांना जास्तीत-जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मनरेगा अंतर्गत कृषि विभागाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत आहेत. मनरेगा अंतर्गत करण्यात येणारी निरनिराळी कामे उदा. व्हर्मी कंपोस्ट उभारणी, नाडेप उभारणी, शेततळे खोदणे व फळबाग लागवड करण्यासाठी पुर्व तयारीची कामे सुरू करण्यात आलेली असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे.
105