हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणेची गरज – पालकमंत्री जयंत पाटील
– सांगली (प्रतिनिधी) हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सुधारणा करण्याची गरज पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रतिपादित केली. या अनुषंगाने त्यांनी कृषी विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी यांच्याबरोबर आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या मंजुरीने निर्णय घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असेही ही सांगितले.
– पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी यांच्यासोबत विविध विषयांवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करण्यात आली. सदर व्हिडिओ कॉन्फरन्स सभेमध्ये कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम, कृषी आयुक्त सुहास दिवसे, पुणे संचालक फलोत्पादन शिरीष जमदाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तासगाव, कवठेमहांकाळ, जत, पलूस व कडेगाव उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी मारुती चव्हाण, चंद्रकांत लांडगे, दिनकर पाटील, राहुल निकम हे उपस्थित होते.
– पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, स्वयंचलित हवामान केंद्रे विस्तारित तालुक्यात उदा. जत १२ किमी पेक्षा जादा अंतरावर असल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. सदर स्वयंचलित हवामान केंद्रे १२ किलोमीटरवर आहेत का याची खात्री करून जर त्याचे अंतर जादा असेल तर हवामान केंद्र वाढवण्याचा विचार करावा. द्राक्ष व डांळीब पिकाकरिता आगावू विमा कालावधी व उशिरा कालावधी करिता विमा याबाबत निकष ठरवून विचार व्हावा. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत बऱ्याच शेतकऱ्यांनी यावेळी मत मांडले. त्या प्रमाणे जादाचे ट्रीगर ठरवून विमा संरक्षीत करता येइल व बाजाराचा विचार करून पीक नियोजन करता येईल. जादा ट्रीगर ठरवून क्रेद्र शासनाची मंजुरी घेता येईल. तसेच याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन सुधारित फळपीक विमा योजना करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेणेत येईल.
– यावेळी त्यांनी सांगली जिल्ह्यात नुकताच झालेला अवकाळी पाऊस व गारपीठ यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून माहिती सादर करा, असे सांगून यामध्ये बेदाणा नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज, जुनोनी या भागामध्ये प्रक्रिया केला गेलेल्या बेदाण्याचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. या अनुषंगाने पंचनामा करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
– कृषी राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांनीही फळपीक विमा योजनेबाबत सांगली व संपूर्ण राज्यात सुधारीत निकष ठरवून जास्तीत जास्त शेतक-यांना लाभ मिळण्यासाठी सुधारीत ट्रीगर निश्चीत करून एक महिना अगोदर सप्टेबर ते मे महिना कालावधीसाठी घेणेबाबत शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. याप्रमाणे सुधारणा करणेत येईल असे सांगितले. तसेच पलुस, कडेगाव तालुक्यात पंचनामे पूर्ण झाले नाहीत ते पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सुचनाही दिल्या.
– कृषीआयुक्त सुहास दिवसे यांनी हवामान आधारित फळपीक विमा योजना, त्याची कार्यपद्धती, निकष याबाबत माहिती दिली. द्राक्ष पीक विमा योजना विमा संरक्षित रक्कम गृहीत धरताना प्रती हेक्टर द्राक्ष कर्ज निश्चित दर विचारात घेतला आहे. फळपीक विम्याकरिता स्वयंचलित हवामान केंद्र दर १२ चौरस किलोमीटर अंतरावर एक उभारले आहे, शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे या वर्षापासून केंद्र सरकारने फळपीक विमा योजना ऐच्छिक करण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले.
80