• Home
  • संपादकीय
  • Gallery
  • Contact
Warnecha Wagh
एक परिपूर्ण निर्भीड वृत्तपत्र
1000789534
कोल्हापूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे काम कौतुकास्पद -आम.विनय कोरे

by संपादक ऑगस्ट 16, 2024
written by संपादक

           कोडोली(प्रतिनिधी) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अत्यंत कमी कालावधीत शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात ८६ हजार २२६ लाभार्थ्यांच्या लाभ मिळवून दिल्याबद्दल विधानसभास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष  आम. विनय कोरे यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू चे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी  अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

             महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणेत येत असलेला तसेच जनसुराज्यशक्ती व सुराज्य फौंडेशनच्या माध्यमातून शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे ‘मोफत नोंदणी अभियान’ राबविणेत आले होते. यामध्ये शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविला आणि कमीत कमी दिवसामध्ये ८६ हजार २२६ एवढी उच्चांकी नोंदणी पूर्ण केल्याबद्दल वारणानगर येथे आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी आम. कोरे बोलत होते.

        शाहूवाडी तालुक्यात ३४ हजार ७७१ तर पन्हाळा तालुक्यात ५१ हजार ४५५ असे दोन्ही तालुक्याचे मिळून एकूण ८६ हजार २२६ एवढे उच्चांकी अर्ज ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून प्राप्त झाले. या योजनेत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी केलेले काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील ८६ हजार २२६ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनची भेट म्हणून १९ ऑगस्ट पर्यंत जून व जूलै या महिन्याचे ३ हजार रुपयांचे अनुदान खातेवर जमा होणार असल्याची माहिती विधानसभास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष म्हणून दिली.

               यावेळी पन्हाळा – शाहूवाडी प्रांत आधिकारी समीर शिंगटे,पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे,पन्हाळा नायब तहसीलदार अस्लम ज मादार,शाहूवाडी गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार,बालविकास प्रकल्प अधिकारी स्नेहल माने, जनसुराज्य शक्तीचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),विशांत महापूरे, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई,माजी सभापती बाबा लाड,परशुराम खुडे,शाहूवाडी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, वैशाली पाटील, गीतादेवी पाटील,रणजित शिंदे यांच्यासह शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ऑगस्ट 16, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000750253
कोल्हापूर

कोरोना, महापूर या वैष्विक संकटाने जीवनाची क्षणभंगुरता आणि सुंदरता कळाली- महेंद्र कुलकर्णी

by संपादक ऑगस्ट 10, 2024
written by संपादक

             वारणानगर (प्रतिनिधी)कोरोना आणि महापूराच्या वैष्विक संकटामुळे आपणास जीवन किती क्षणभंगुर आहे याची शिकवण मिळाली त्यामुळे  जीवन सुंदर करण्यासाठी पहिल्यांदा इतरांचे जीवन सुखी करा असा मौलिक सल्ला वक्ते महेंद्र कुलकर्णी यांनी दिला. 

                येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना आणि श्री शारदा वाचन मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या वर्षा व्याख्यानमालेत ” क्षणिक परि सुंदर ” या विषयावर बोलताना महेंद्र कुलकर्णी  पुढे म्हणाले की आजकाल घराघरात माणसा माणसात द्वेषाने वितूष्ठ येताना दिसत आहे. नवी पिढी मोबाईलच्या आहारी जाऊन विचार शुन्य बनत आहे. वयोवृद्ध आणि वयस्कर माणसांची विचारपूस आणि सांभाळणूक करण्यात मोठी अडसर वाटत आहे परिणामी वृध्दाश्रमाच्या आश्रयाला जावे लागत आहे. नात्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. कोरोना आणि महापूर सारख्या भयानक संकटाने जगणं किती महत्वाचे आहे. संकटे कशी भयानक असतात. आजही केवळ त्या संकटाची केवळ आठवण काढली तरी अंगावर शहारे येतात.ज्यांना कोरोना झाला होता त्यांना पुनर्जन्म झाल्याची प्रचीती आली आहे. त्यामुळे जीवन क्षणभंगुर आहे. म्हणून मिळालेले जीवन सुंदर करण्यासाठी चांगले आचार, विचार ,आहार ,विहार, या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत तरच क्षणिक असलेले जीवन सुंदर होईल असे वक्ते महेंद्र कुलकर्णी यांनी समारोपाच्या व्याख्यानावेळी आपले मत व्यक्त केले.

              याप्रसंगी  निवृत्त शिक्षिका आणि वारणा भगिनी मंडळाच्या संचालिका रमाताई काशिद यांच्या हस्ते  महेंद्र कुलकर्णी  यांचा सत्कार करण्यात आला. व्याख्यानमाला यशस्वी पार पाडल्याबद्दल संयोजक ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांचा सत्कार वारणा दुध संघाचे संचालक, शिवाजीराव जंगम  यांनी केला केला. या कार्यक्रमास प्रमोद कोरे, के जी जाधव, सुरेश साखरपे,ऋतुगंध कूलकर्णी,शशिकांत कुलकर्णी, सुरेश साखरपे,संभाजी मुदगल,प्रतिभा कोले,आदींसह   वारणा समुहातील विविध संस्थांचे संचालक, पदाधिकारी  मान्यवर विद्यार्थी, रसिक श्रोते उपस्थित होते.  पाहुण्यांचा परिचय प्रा नामदेव चोपडे यांनी करून दिला. आभार ग्रंथपाल बाबासाहेब कावळे यांनी मानले.

ऑगस्ट 10, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000757301
कोल्हापूर

चांगला माणुस होण्यासाठी चांगले विचार आत्मसात करा- संभाजी यादव

by संपादक ऑगस्ट 10, 2024
written by संपादक

जोतिर्लिंग पब्लिक स्कुल मध्ये आनंददायी उपक्रम

            कोडोली(प्रतिनिधी)आयुष्यात प्रत्येकालाच चांगला माणुस म्हणुन संबोधले जावे अशी भावना असते.चांगला माणुल बनण्यासाठी चांगले विचार आत्मसात करा.असा सल्ला प्रसिद्ध विनोदी कलाकार संभाजी यादव कौलवकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.ते महाराष्ट्रशासनाच्या आनंददायी शनिवार या उपक्रमातंर्गत जोतिर्लिंग पब्लिक स्कुल,माले य़ांच्यावतीने आयोजित हसण्यासाठी जगा…आणि जगण्यासाठी हसा…या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

                कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे,मुख्याध्यापिका सविता कळंत्रे,धनाजी पाटील,किरण यादव,उपमुख्याध्यापक सतिश रणभिसे,सचिन कोडोलकर,एस.एम.कांबळे  आदी मान्यवर उपस्थित होते.

                  यावेळी संभाजी यादव यांनी आपल्या विनोदीशैलीने हास्याचे फवारे उडवले.विविध अभिनेत्यांचे-राजकीय नेत्यांचे आवाज,विविध पशु-पक्षी,कडक लक्ष्मीच्या वाद्याचा आवाज,कलापथकाच्या संगीताचा आवाज त्यांनी आपल्या कठंटातुन अगदी अचुक पणे काढले.वेगवेगळे आवाज आणि विनोदामुळे जोतिर्लिंग मध्ये हास्य जत्रे स्वरुप प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांचे मनोरंजन चांगल्या पध्तीने झाल्याने कार्यक्रमाला एक वेगळा रंग चढला होता.

                संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी संभाजी यादव हे ७५ टक्के दिव्यांग  असुन देखील त्यांनी कोणतेही खंत न बाळगता आपला प्रवास सुरु ठेवला आहे.त्यामुळे इच्छा जर प्रबळ असेल आणि जिद्द ,चिकाटी ठेवल्यास आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करु शकतो.याचे मुर्तीमंत उदाहऱण म्हणजेच संभाजी यादव कौलवकर आहेत,असे सांगितले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार एस.एम.कांबळे यांनी मानले.

ऑगस्ट 10, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000747246
महाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शाहुवाडी- पन्हाळा तालुक्यातील 86 हजार २२६ अर्ज मंजूर-आम. विनयरावजी कोरे

by संपादक ऑगस्ट 10, 2024
written by संपादक

                कोडोली( प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पन्हाळा व शाहूवाडी या दोन्ही तालुक्यांमध्ये आलेल्या एकूण अर्जापैकी ८६ हजार२६६ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. अशी माहिती पन्हाळा- शाहूवाडी चे आम.तथा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे विधानसभास्तरीय अध्यक्ष आम. विनय कोरे यांनी दिली.

           शाहूवाडी येथील तहसीलदार कार्यालयात    विधानसभास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना समितीची बैठक आम. विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविणेत येत असलेला तसेच जनसुराज्यशक्ती व सुराज्य फौंडेशनच्या माध्यमातून शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे ‘मोफत नोंदणी अभियान’ राबविणेत आले होते.यामध्ये शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदविला आणि कमीत कमी दिवसामध्ये उच्चांकी ऑनलाईन नोंदणी पूर्ण केली.

                 शाहूवाडी तालुक्यात ३४ हजार ७७१ तर पन्हाळा तालुक्यात ५१ हजार ४५५ असे दोन्ही तालुक्याचे मिळून एकूण ८६ हजार २२६ एवढे उच्चांकी अर्ज ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून प्राप्त झाले.या पात्र झालेल्या अर्जाची छाननी करून आम. विनय कोरे यांनी मंजुरी दिली.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील ८६ हजार २२६ महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनची भेट म्हणून १९ ऑगस्ट रोजी जून व जूलै या महिन्याचे ३ हजार रुपयांचे अनुदान खातेवर जमा होणार असल्याची माहितीही यावेळी विधानसभास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना समितीचे अध्यक्ष आम.विनय कोरे यांनी दिली.

                यावेळी पन्हाळा – शाहूवाडी प्रांत आधिकारी समीर शिंगटे, शाहूवाडी तहसीलदार रामलिंग चव्हाण,पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्यासह शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ऑगस्ट 10, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000754555
महाराष्ट्र

सांगलीत ऑगस्ट क्रांतीदिन उत्साहात साजरा

by संपादक ऑगस्ट 9, 2024
written by संपादक

            सांगली : (प्रतिनिधी )भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वाची सुरुवात नऊ ऑगस्ट 1942 ला झाली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने या दिवशी आरपारची लढाई करण्याची घोषणा केली. ‘भारत छोडो’ ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणांनी मुंबई शहर दुमदुमले या लढ्याला सातारा जिल्ह्यातील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारने क्रांतिकारक भूमिका वठवली. 

              या दिवसाचे महत्व लक्षात घेऊन या लढ्याला 82 वर्षे पूर्ण होत असताना सांगली येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला शेकडो मुले-मुली स्वातंत्र सैनिकांचे वारसदार शिक्षक नागरी बंधू भगिनीसह पुरोगामी विचाराच्या वारसदारांनी या देशात पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई करण्याची शपथ घेऊन प्रतिगामी शक्तींचा बीमोड करण्याची शपथ घेतली. 

              क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या वर्षात प्रत्येक महिन्याला एक कार्यक्रम प्रबोधनाच्या दृष्टीने घेण्याचे याप्रसंगी क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्य सन्मान समितीचे संयोजक ॲड.अजितराव सूर्यवंशी यांनी जाहीर केले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापुढे झालेल्या भव्य कार्यक्रमाच्या प्रारंभी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनींनी लेझीमचे खेळाचे पाच डाव सादर केले . तदनंतर  महाराष्ट्र शाहीर बजरंग आंबी यांनी पहाडी आवाजात क्रांतीदिनानिमित्त पोवाडा सादर केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी केले. केबीपी स्कूलच्या विद्यार्थिनी मैत्री शहा हिने क्रांती दिनावर प्रभावी भाषण केले.याप्रसंगी महापालिकेचे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार शहाजीराव जाधव यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. 

            रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज, पंडित नेहरू विद्यालय कवलापूर, कर्मवीर भाऊराव पाटील स्कूल म्हैशाळ, केबीपी इंग्लिश मेडियम स्कूल सांगली या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी गणेश नाष्टा सेंटरचे मालक आनंदराव सावंत यांनी सर्व उपस्थितांच्या अल्पोउपहाराची व्यवस्था केली.

              या कार्यक्रमास ॲड.तेजस्विनी सूर्यवंशी, प्रा. सिकंदर जमादार , ॲड.अमित शिंदे, जब्बार बारस्कर, दीपक पाटील, अनिल माने ,अमोल माळी, जयसिंगराव सावंत ,महावीर कोथळे ,संतोष पत्रावळे, मोहनराव देशमुख, प्रशांत पवार, उद्योजक विनोद पाटील, शशिकांत ऐनापुरे, अमृता चौगुले, किरण पाटील,नितीन मिरजकर, शशिकला घाडगे, रंगराव शिपूगडे, विठ्ठलराव काळे, रवींद्रनाथ घाडगे,नंदिनी बिरजे, रत्नाकर गोंधळी ,माधुरी कोरे, सुनिता ऐवळे ,उत्तमराव कांबळे, प्रशांत पवार , अप्पासाहेब पाटील,यासह नागरिक उपस्थित होते.रेखा पाटिल यांनी आभार मानले.

ऑगस्ट 9, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000755426
महाराष्ट्र

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया.. !

by संपादक ऑगस्ट 9, 2024
written by संपादक

            बघता बघता गणेशोत्सवाची लगबग सुरु होईल आणि वातावरणात चैतन्य पसरेल.. शासन आणि त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या वतीनं पर्यावरण पूरक गणेशोत्सव उपक्रम राबवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येत आहेत. पुरोगामी विचारांचा जिल्हा असणारा कोल्हापूर जिल्हा या उपक्रमात अग्रेसर आहे. आपणही शाडू अथवा मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना, कृत्रिम कुंडात मुर्ती विसर्जन, मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांवर भर, लोककला व शिवकालीन साहसी कलांच्या सादरीकरणातून या कलेला चालना, डॉल्बीचा मर्यादित आवाज ठेवून खऱ्या अर्थानं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करुया आणि आपल्या आरोग्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करुया.. !

            शाडू व मातीच्या गणेश मूर्तींवर भर-सध्या बहुतांश गणेश मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवल्या जातात. तसेच या मूर्तींना सजवण्यासाठी हानिकारक ठरणारे रंग वापरले जातात. या मूर्तींचे पाण्यात विसर्जन केले तरी त्या पाण्यात पूर्णपणे विरघळत नाहीत.  त्यामुळे जल, वायू प्रदुषणात भर पडते. म्हणूनच शाडू अथवा मातीच्या गणेश मूर्ती बसवण्यावर भर देणं गरजेचं आहे.

           पारंपरिक वाद्यांचा वापर– विविध भागांतील लोकनृत्य, कलापथक व पारंपरिक वाद्य ही आपल्या देशाची खरी ओळख आहे. कोणत्याही मोठ्या सण समारंभात ढोल, ताशा, हलगी, झांज, लेझीम तसेच तलवारबाजी, दांडपट्टा, मर्दानी खेळ, अशा शिवकालीन साहसी कला प्रकारांना चालना देणे आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सव व मिरवणुकीदरम्यानही लोकनृत्य व पारंपरिक वाद्यांच्या सादरीकरणावर भर देणे आवश्यक आहे.

              पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी राज्य शासनाचे प्रयत्न–  राज्य शासनाच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देवून गौरवले जाते. मागील वर्षी राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकाच्या मंडळाला 5 लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवले होते. तर उर्वरित उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

           पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील- जिल्ह्यात सन 2015 पासून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून सन 2015 ते 2023 या नऊ वर्षांत या उपक्रमाला येथील नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात जिल्ह्यातील सर्व कुटुंबांनी सहभागी होण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषदांमार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. हा उपक्रम अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने यशस्वी होण्यासाठी तसेच जिल्ह्यातील नदी, तलाव, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी अशा सार्वजनिक जलस्त्रोतांचे प्रदूषण होवू नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी नियोजन केले आहे.

              जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस अधीक्षक, पर्यावरण विभागाचे अधिकारी व तज्ज्ञांसमवेत जिल्ह्यातील गणेश मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमात कोल्हापूर जिल्हा राज्यात व देशात अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

           जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनीही सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमासाठी चोख नियोजन केले आहे . या उपक्रमात अधिकाधिक कुटुंबे सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायतींना आवाहन करण्यात येत आहे.

            गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेनुसार सार्वजनिक गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करणे, घरगुती गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करताना धातुच्या, संगमरवरी, इतर पर्यायी किंवा मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करणे तसेच घरगुती गणेशमुर्तीचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी किंवा नजिकच्या कृत्रिम तलाव, कुंड अशा कृत्रिम विसर्जन स्थळी करण्याबाबत गाव स्तरावर प्रबोधन, गावनिहाय मुर्ती संकलन व विसर्जन, फेर विसर्जनासाठी दिलेल्या मुर्ती मुर्तीकारांकडे परत देण्यासाठी गावस्तरावर यादी करणे, निर्माल्य संकलन, वाहतूक व्यवस्था व त्याचे सुयोग्य व्यवस्थापन याबाबत आशा, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे जिल्हा स्तरावरुन सनियंत्रण करण्यात येणार आहे.

              पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी मागील वर्षी जिल्ह्यात एकूण 1 हजार 122 जुन्या विहीरी, खणी निश्चित करण्यात आल्या होत्या. तर एकूण 977 काहिली, कृत्रिम तलाव, मोठी भांडी अशी पर्यायी व्यवस्था केली होती. तसेच मुर्ती परत घेण्यासाठी 300 मुर्तीकार होते. निर्माल्य संकलनासाठी 1 हजार 321 ट्रॉली व 188 घंटागाडी ठेवण्यात आल्या होत्या.

              सन 2023 मध्ये 4 लाख 67 हजार गणेशमूर्ती संकलित करुन त्या जलस्त्रोतात विसर्जित न करता पर्यायी विसर्जन कुंड तयार करुन श्रद्धापूर्वक विसर्जित केल्या गेल्या. नदी प्रदुषण टाळण्यासाठी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रमोद माने यांनी केले आहे.

            फटाक्यांचा अतिरेक टाळुया- फटाक्यांमधील हानिकारक वायू आणि विषारी पदार्थ वातावरणात मिसळले गेल्यामुळे वायू आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होवून आरोग्याला धोका पोहोचू शकतो. यासाठी सर्वच सार्वजनिक सण, समारंभांमध्ये फटाक्यांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे.

            आवाजाची पातळी मर्यादित ठेवूया- कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागामार्फत सन 2023 मधील गणेशोत्सवा दरम्यान कोल्हापूर शहरातील 22 ठिकाणच्या आवाजाची मोजमाप चाचणी केली होती. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वच ठिकाणी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड) ने घालून दिलेल्या मानांकनापेक्षा जास्त मर्यादा ओलांडण्यात आल्याचे दिसून आले. शैक्षणिक परिसर, रुग्णालये, न्यायालयाच्या आसपासच्या शांतता क्षेत्रातही आवाजाची पातळी प्रमाणापेक्षा कित्येक पटीने जास्त असल्याचे संशोधनातून आढळून आले.

               रहिवासी क्षेत्रात रात्रीच्या वेळी 45 डेसिबलच्या आसपास आवाजाची पातळी असणे आवश्यक असते. मात्र अनंत चतुर्दशी दिवशी झालेल्या मिरवणुकीदरम्यान शहरातील बहुतांशी भागात 76 ते 78 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. मिरवणूक मार्गावर रात्रीच्या वेळी 102 डेसिबल म्हणजे साधारण दुप्पटीच्या आसपास आवाजाची नोंद झाली असल्याची माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या विभाग प्रमुख आसावरी जाधव यांनी दिली आहे. आरोग्याच्या हितासाठी सण, समारंभ, मिरवणूकांदरम्यान आवाजाची पातळी मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.

               पर्यावरण स्नेही कृतीची गरज – गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारे जल स्त्रोतांचे प्रदूषण आणि गाळाचे प्रमाण अधिक होऊन उद्भवणारा पुराचा धोका, फटाके आणि ध्वनीक्षेपकांनी मर्यादा ओलांडल्यामुळे झालेले हवेचे आणि आवाजाचे प्रदूषण हे मानवाला विशेषत: वृध्द, गर्भवती आणि लहान मुलांना आघात पोहचविणारे आहे. लोकांनी याबाबत सजगपणे बदल स्वीकारुन पर्यावरण स्नेही कृती केली पाहिजे. तरच पर्यावरण टिकून राहण्यास मदत होईल, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांनी केले आहे.

                 चांगल्या आरोग्यासाठी खबरदारी घेवुया- सर्वसाधारणपणे आपण 50 डेसिबल पर्यंतचा आवाज अर्ध्या ते एक तासापर्यंत सहन करु शकतो त्याहून अधिक आवाज अर्ध्या तासापेक्षा जास्त ऐकावा लागला तर डोके दुखणे, डोके जड येणे अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो. तर त्याहून जास्त पातळीचा आवाज तीन मिनिटांहून अधिक काळ सलग ऐकावा लागला तर कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे ठोके वाढू लागतात. तसेच शरीराचे ब्लड सर्क्युलेशन गतीने होते. यामुळे उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) जडतो. त्याचबरोबर ब्लड प्रेशर मध्ये चढ-उतार होऊन हृदय, मेंदू व शरीराच्या कोणत्याही भागाला इजा पोहोचू शकते. 130 हुन अधिक डेसिबल आवाजामुळे कान, डोके सुन्न होणे, चक्कर येऊन शुद्ध हरपून जाणे मेंदूत रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) होऊ होवू शकतो. तसेच कानाचे पडदे फाटून कायमस्वरूपी बहिरत्व येऊ शकते. हृदयात धडधड, हार्ट फेल्युअर कायमचा हृदयविकार किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो.सर्वसाधारणपणे 70 डेसिबल होऊन अधिक आवाजाच्या पातळीतील डॉल्बी स्टेरिओचा आवाज धोकादायक ठरु शकतो. त्यातही बंद सभागृहातील स्पीकर्स डॉल्बी साउंड अधिक धोकादायक ठरतात. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा रात्रीच्या शांत वातावरणात 70 हून अधिक डेसिबल आवाज अत्यंत हानिकारक ठरु शकतो. लहान बालके, गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक, हृदय रुग्ण, पॅरालिसीसचे रुग्ण व मनोरुग्णांना 60 डेसिबल हून अधिक आवाजाची पातळी धोकादायक ठरण्याबरोबरच आजार वाढवणारी ठरु शकते. गरोदर मातांच्या पोटातील बाळाच्या अवयवांना धोका पोहोचून वाढीवर परिणाम होऊ शकतो तसेच प्री मॅच्युअर डिलिव्हरी होऊ शकते, अशी माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील हृदय चिकित्सा विभाग (कार्डीओलॉजी) विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय बाफना यांनी दिली आहे.

                कान, डोळ्यांची काळजी घ्या- हल्ली सण, समारंभादरम्यान डॉल्बी स्टेरिओच्या आवाजाची पातळी 90 ते 100 डेसिबल पेक्षाही अधिक असते. यामुळे कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते तसेच पडद्याच्या आतील हाडांच्या साखळीला किंवा अंतरकर्णातील वाहिन्यांना धोका पोहोचू शकतो. यामुळे तात्पुरते किंवा कायमचे बहिरत्व येऊ शकते. यासाठी डॉल्बी स्टेरिओचा आवाज शक्यतो 80 डेसिबल पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण स्पीकरच्या समोर उभे राहणे टाळणे आवश्यक आहे. तसेच लेझर लाईट मुळे दृष्टी कमी होण्याचा किंवा गमावण्याचा धोका होऊ शकतो. म्हणूनच लेझर लाईट डोळ्यावर पडणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे आवाहन छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) मधील कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी दिली आहे.

             गणेश मंडळांमार्फत सामाजिक प्रबोधनाला प्राधान्य देवुया – गणेशोत्सव, नवरात्र तसेच महापुरुषांच्या जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या उत्सवातून महापुरुषांचे विचार व त्यांच्या कार्याचा तसेच सामाजिक प्रबोधनपर विषयांचा प्रचार व प्रसार होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवानिमित्त केलेले देखावे पाहण्यासाठी हजारो नागरिक गणेश मंडळांना भेटी देतात. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळे देखाव्यांमधून झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक बंदी, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता, पाण्याची बचत अशा पर्यावरण रक्षण तसेच सामाजिक एकात्मता, महिला सक्षमीकरण, महिला व बालकांचे कायदे, विधवा प्रथा बंदी, व्यसनमुक्ती, ऐतिहासिक, पुरातन वास्तु आणि गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन अशा विषयांवर जनजागृती करताना तसेच ढोल ताशा सारख्या पारंपरिक वाद्यांचा वापर करत असल्याचे दिसते. परंतु, देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या व उत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढणे आवश्यक आहे. त्याचबरोबर देखावे तयार करताना पर्यावरणपूरक घटकांच्या वापरावर भर दिल्यास प्रदूषणही रोखले जाईल..

        गणेशोत्सव हा अबाल, वृद्धांच्या आनंदाचा.. मांगल्याचा.. जल्लोषाचा सण.. या सणात पारंपरिक वाद्ये, लोककला व साहसी खेळांचे सादरीकरण होण्याबरोबरच सामाजिक प्रबोधनावर आधारीत देखाव्यांवर भर देवुया.. आणि हा सण मोठ्या उत्साहात.. भक्ती भावानं.. श्रध्देनं.. आत्मियतेनं आणि आरोग्याची काळजी म्हणून पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करुया..!

– वृषाली पाटील,

माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय,कोल्हापर 

 

ऑगस्ट 9, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
महाराष्ट्र

पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट मधील विविध कोर्सेसना प्रवेशासाठी मुदत वाढ

by संपादक ऑगस्ट 9, 2024
written by संपादक

             कोडोली( प्रतिनिधी )पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा येथे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व्यवसाय व प्रशिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई (MSBSVET) बोर्डाच्या विविध कॉम्प्युटर व तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश देणे सुरू असून सर्व कोर्सेसना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती संचालक सुनीलकुमार पाटील यांनी दिली.

                इलेक्ट्रिकल सुपरवायझर ऑन कन्स्ट्रक्शन साईट, ऑटोमोबाईल मेकॅनिक टेक्निशियन, इलेक्ट्रिक वायरमन ,मोटार आर्मिचर वायडिंग, टू- व्हीलर व फोर- व्हीलर मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर विथ एम. एस. ऑफिस, पर्सनल कॉम्प्युटर हार्डवेअर मेंटेनन्स, एअर कंडिशन रेफ्रीजरेशन मेकॅनिक ,प्लंबर, डिप्लोमा इन ऑटोमोबाईल टेक्निक, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल या कोर्सेसना प्रवेश देणे सुरू असून आठवी, दहावी, बारावी पास/ नापास अशी प्रवेशासाठी पात्रता आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार यांनाही या कोर्सेसना प्रवेश घेता येतो. या कोर्सेससाठी मराठी व इंग्रजी अशी दोन्ही माध्यम उपलब्ध असून भरपूर प्रॅक्टिकल घेतली जातात.

                 विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी एस.टी. बस पास सवलतअसून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना १००%, दिली जाते. याबरोबर विविध लायसन संदर्भात मार्गदर्शन केले जाते. प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी प्राचार्य सुजित पाटील, पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, प्लॉट नंबर ११, नवीन राधिका रोड, एसटी स्टँड जवळ, सातारा येथे ऑफिस वेळेत संपर्क साधावा.

ऑगस्ट 9, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000733466
कोल्हापूर

विद्यार्थ्यांनो जिद्द ठेवा, यश नक्की मिळेल-जयश्री देसाई

by संपादक ऑगस्ट 9, 2024
written by संपादक

मामासाहेब गुळवणी  स्मृतिदिनानिमित्त वारणेत ७० गुणवंतांचा सत्कार                      

                 कोडोली (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनो जिद्द ठेवल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी केले.  वारणानगर येथील वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहाचे मार्गदर्शक व स्व. तात्यासाहेब कोरे यांचे जेष्ठ सहकारी स्व. मामासाहेब गुळवणी यांच्या १८व्या पुण्यतिथीनिमित्त वारणा परिसरातील दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रथम आलेल्या ७०गुणवंत विध्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वारणा कारखाना कार्यक्षेत्रातील १२ युवक -युवतीची स्पर्धा परीक्षे  मधून विविध पदावर निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीआम. विनय कोरे होते.

                 वारणा साखर कारखाना , वारणा सत्कार्य, वारणा युवक, क्रीडा प्रबोधिनी, महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या समारंभाचे संयोजन केले होते. कार्यक्रमास पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे – जाधव, वारणा भगिनी मंडळाच्या अध्यक्षा स्नेहताई  कोरे , श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही. व्ही कारजिन्नी, वारणा सत्कार्य मंडळाचे विश्वस्त के. एम . वाले, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव , वारणा दूध संघाचे संचालक माधव गुळवणी   शिवाजीराव जंगम , कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग आदी मान्यवर उपस्थित होते.प्रा

         प्रास्ताविक ग्रंथमित्र प्रा. के. जी. जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. एस. आर. कुलकर्णी,प्रा. यु. आर. पाटील, राजेंद्र पाटील , संजय जाधव,लखन करे,  युवराज जाधव, रवि देवकर ,प्रल्हाद लोहार यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास वारणा परिसरामधील विविध संस्थांचे पदाधिकारी,  शिक्षक,पालक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रा. पी. बी. बंडगर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

ऑगस्ट 9, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000733172
कोल्हापूर

वाचन संस्कृतीच्या ऱ्हासामुळे समाज झुंडशाहीकडे वळत आहे – प्रा. कृष्णात खोत अनिल शिणगारे यांच्या बालकथा संग्रहाचे प्रकाशन

by संपादक ऑगस्ट 8, 2024
written by संपादक

          कोडोली ( प्रतिनिधी) भविष्यात समाजात अराजकता निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. ही अराजकता समाज व देशाला परवडणारी नाही असे सांगून वाचन संस्कृतीच्या ऱ्हासामुळे समाज झुंडशाही कडे वळत आहे असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी मांडले. 

             कोडोली (ता. पन्हाळा )येथील प्राथमिक शिक्षक अनिल शिणगारे  यांनी लिहिलेल्या ‘कल्पनेच्या तीरावर’ व ‘करामती बाळू’ या दोन बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा. खोत यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी पन्हाळ्याचे गटशिक्षणअधिकारी शिवाजी मानकर, राजश्री शाहू परिवार नेते बबन केकरे,दिपाली शिणगारे हे उपस्थित होते .

               प्रा. खोत म्हणाले समाजातील कल्पनाशक्ती मारली जात आहे. त्यामुळे तो समाज यांत्रिक होऊन निराशाकडे जात आहे. भाषा शुद्ध व अशुद्ध असत नाही तरी ती भाषाप्रमाण असते. यावेळी अनिल शिणगारे म्हणाले वाचन समृद्ध असेल तर लेखक घडेल असा असा आशावाद व्यक्त करून बाल सहवास भरपूर लाभला असल्याचे सांगितले. यापूर्वी अनिल शिणगारे यांच्या ‘गोपाळाची पोर’हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. प्रास्ताविक राजश्री शाहू पतसंस्थेचे चेअरमन प्रताप राबाडे यांनी केले . सूत्रसंचालन बबलू वडर यांनी तर आभार बाबासाहेब पाटील यांनी मांनले.

ऑगस्ट 8, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
1000737364
कोल्हापूर

गायत्री सरनाईक बहिरेवाडीच्या पहिल्या महिला पोलीस निरीक्षक सासूच्या पाठिंब्यावर सून बनली पीएसआय

by संपादक ऑगस्ट 7, 2024
written by संपादक

              कोडोली:( प्रतिनिधी) बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथील गायत्री सरनाईक यांनी जिद्द व आत्मविश्वासाच्या जोरावर महिला पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत यश मिळवले. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांनी हे यश संपादन केले. या यशात त्यांना सासूबाईंचे मोठे पाठबळ मिळाले.

                गायत्री सरनाईक यांचे माहेर आपटी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर दहावीपर्यंत शिक्षण पन्हाळा येथे पूर्ण झाले. त्यांचे पदवीपर्यंतचे उच्च शिक्षण वारणा महाविद्यालयात झाले. गायत्री यांचे पहिल्यापासून पीएसआय होण्याचे स्वप्न होते. लग्नानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन 2020 साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली त्यावेळेस दोन गुणांनी त्यांची संधी हुकली. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याकरिता त्यांच्या घरच्यांनी व सासूबाईंनी पाठिंबा दिल्याने त्यांनी पुन्हा जिद्दीने अभ्यास करून 2022 मध्ये परीक्षा दिली आणि त्या यशस्वी झाल्या.

               गायत्री सरनाईक यांनी सासूबाईंच्या पाठबळावर यशस्वी झेप घेतली परंतु त्यांच्या सासूबाईंचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाल्यामुळे त्या गेली चार महिने खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. एकीकडे परीक्षा पास झाल्याचा आनंद तर दुसरीकडे सासूबाई दवाखान्यात असल्याचे दुःख ही त्यांच्या कुटुंबावर आहे. गायत्री या बहिरेवाडीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या असून पन्हाळा पंचायत समितीच्या सदस्य पदाची त्यांनी निवडणूक लढवली होती.

ऑगस्ट 7, 2024 0 comment
0 FacebookTwitterPinterestEmail
Newer Posts
Older Posts

संपादक

संपादक

प्रवीण पाटील, संपादक, वारणेचा वाघ.

वारणेचा वाघ वाचकांनो, २३ वर्षांचा प्रेरणादायक प्रवास तुमच्या सोबतीमुळेच शक्य झाला. वाचन हा ज्ञानाचा खरा खजाना आहे, वाचन सुरू ठेवा आणि मनाच्या आकांक्षांना पंख लावून द्या!

Recent Posts

  • देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय – मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
  • मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
  • मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत
  • गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील
  • कोडोली नगरभूमापन कार्यालयात तातडीने अधिकारी नेमणूक करावी

Recent Comments

  1. Sushant subhash chavan च्यावर कोडोलीतील कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक – प्रशासनास उशिरा सुचलेले शहाणपण.
  2. Dr. Sanjay Sagaru Sapkal च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  3. ANIL PATIL च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  4. ANIL PATIL च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे
  5. Dipak chavan च्यावर वारणा विभाग शिक्षण मंडळ देणार ऑनलाईन शिक्षणाचे धडे

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Bloglovin

Recent Posts

  • देशाच्या विकासात सहकारी संस्थांचे योगदान अतुलनीय – मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

    सप्टेंबर 3, 2024
  • मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

    सप्टेंबर 2, 2024
  • मा.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

    सप्टेंबर 2, 2024
  • गोकुळच्या योजनांचा लाभ घेऊन आपला आर्थिक विकास करा- अमरसिंह पाटील

    ऑगस्ट 31, 2024
  • कोडोली नगरभूमापन कार्यालयात तातडीने अधिकारी नेमणूक करावी

    ऑगस्ट 30, 2024

कॅटेगरीज

  • Uncategorized (3)
  • कोल्हापूर (257)
  • जागतिक (1)
  • महाराष्ट्र (112)
  • राष्ट्रीय (46)
  • वारणेचा वाघ फौंडेशन (6)
  • साप्ताहिक (8)
  • Facebook
  • Twitter

@2021 - All Right Reserved. Designed and Developed by PenciDesign


Back To Top
Warnecha Wagh
  • Home
  • संपादकीय
  • Gallery
  • Contact